पुणे : वारीसोबत वारकऱ्यांचे सामान घेऊन चालणाऱ्या वाहनांना एका विशेष पासचे वाटप करण्यात येणार आहे. ही वाहने कुठेपर्यंत आलेली आहेत वा वाहतूक कोंडीत अडकली आहेत हे कळण्यासाठी ‘माऊली विठ्ठलयात्रा’ या मोबाइल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान आळंदीहून २५ जूनला होणार असून, या वर्षी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या माध्यामातून यंदा अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या अॅपवर दिंड्यांच्या गाड्यांचे नंबर, दिंडीमालकाचे नाव, दूरध्वनी क्रमांक, वाहनचालकाचे नाव व त्याचा दूरध्वनी क्रमांक, गाडीचे ठिकाण दाखविणारे जीपीएस लोकेशन हा सर्व तपशील समाविष्ट केला जाईल. त्यामुळे वाहनचालक, दिंडीमालक, संस्थान कमिटी व पोलीस यंत्रणा यांच्यात संपर्क राखणे सहज शक्य होईल.
पालखी सोहळा प्लॅस्टिक व थर्माकोल मुक्त होण्यासाठी यंदा प्रत्येक दिंडीला एक हजार याप्रमाणे सुमारे पाच लाख नैसर्गिक पत्रावळ्यांचे विनाशुल्क वाटप करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी अशाच प्रकारे सुमारे साडेचार लाख पत्रावळ्यांचे वाटप करण्यात आले होते.